दोन आठवड्यापूर्वी मी नागपूरला गेलो होतो. नागपूरहून हिंगणघाटजवळच आहे. आता हिंगणघाटमध्ये विशेष काय म्हणाल तर माझ्यासाठी आणि पल्लवीसाठी ती जागा खासच आहे. जवळजवळ सोळा वर्षांपूर्वी मला आणि पल्लवीला हिंगणघाटच्या मंदिरात श्रीमाधवनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची अविस्मरणीय संधी मिळाली होती. म्हणून हिंगणघातला जाणं माझ्यासाठी खास होतं. नागपुरात गाडी भाड्याने घेऊन मी हिंगणघाटला गाडी चालवत निघालो…. बरीच वर्षं लोटली होती … मला आधीच्या अनुभवावरून वाटलं होतं की मला पोहोचायला दोन–एक तास लागतील… पण इतक्या वर्षांत रस्ते इतके छान झाले होते की मी तासाभराच्या आताच पोहोचलो. दुसरं म्हणजे मी पूर्ण विसरलो होतो की हिंगणघाट हे तसं मोठे शहर आहे आणि इतक्या वर्षांत ते सुद्धा बदललं असेल. मी तर मंदिराचा पत्ताही घेतला नव्हता … साधारणपणे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ मंदिर आहे एव्हढच आठवत होतं. . हायवेवरून गाडी वळवली आणि मग ठरवलं की बघू आपल्याला मंदिर सापडतंय का. मग कुणालाही ना विचारात गल्ल्याबोळांतून गाडी चालवत निघालो. एक कापडगिरणीची चिमणी दिसल्यावर काहीतरी ओळखीचं वाटलं म्हणून उजवं वळण घेतलं आणि गाडी बरोब्बर मंदिराच्या दारात थांबली.
एक अनुभव म्हणून मी हा किस्सा माझ्या मित्रांना सांगितला. माझा एक मित्र मला लगेच म्हणाला, “तुझ्या श्रद्धेनं तुला बरोबर मंदिरापाशी सोडलं “. दुसरा लगेच ताड्कन म्हणाला, “काहीतरी फालतू बोलू नकोस … विज्ञानानं हे सिद्ध केलय की आपला मेंदू एखाद्या सुपरकॉम्प्युटरसारखाअसतो. एकदा माहिती साठवली गेली की ती कायमची राहते आणि कधीही वापरता येते. त्याला कुठलही टेन्शन नव्हतं म्हणून त्याला माहिती सहज आठवली” … “अरे सोड अध्यात्माच्या समोर विज्ञान बिगरीतअसतं.” …. एक वेगळाच वाद चालू झाला…. असे काही वाद चालू झाले की माझं मन आपोआप “स्विच–ऑफ” होतं.
मतभिन्नता असण्यात चुकीचं काहीच नाही पण आपल्यापेक्षा वेगळ्या मताबद्दल जो तिरस्कार असतो तो मात्र मला नेहमीच अस्वस्थ करून जातो. आपली मतं ही बऱ्याच वेळा आपल्या संस्कारांवरून किंवा अनुभवावरून तयार झालेली असतात. आपल्याला आलेल्या अनुभवापेक्षा दुसऱ्यांचे अनुभव वेगळे असू शकतात. आपल्यापेक्षा दुसऱ्यांची मतं ही वेगळी असू शकतात ती चूक किंवा बरोबर ठरवायची खरंच गरज असते का हा प्रश्न आपल्याला विचारून बघावा – आयुष्य सोपं होईल.
एव्हढ्यात माझ्या मित्रांनी मला विचारलं की “तुला स्वतःला काय वाटतं – तुला मंदिरापर्यंत कोणी नेलं श्रद्धेनं की विज्ञानानं?” मी नुसताच खांदे उडवून हसलो आणि मग मात्र दोघांचं एकमत झालं “छ्या – ह्याला काही मतच नसतं – नुसतंच डिप्लोमॅटिक वागतोय“…. मला आता प्रश्न पडलाय की ह्यांना कसं समजावून सांगावं की मला दोघांचीही मतं पटतायंत – माझं मतानें जिथे फरक पडतो तिथेच मी मत व्यक्त करतो …. मोदी की राहुल ह्यावर व्हॉट्सअपवरून मित्रमैत्रिणींशी माऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा मतदानाच्या दिवशी मी माझं मत ना चुकता देईन आणि जो निकाल लागेल त्याचा आदर करीन … लोकांच्या मतांमागे त्यांची आपली काही भूमिका असेलच …. जरी तो निकाल माझ्या मतांपेक्षा वेगळा असला तरीही त्याचा आदर करणे आवश्यक आहे … बाकीच्यांचं माहित नाही पण माझ्यापुरतं तरी माझं आयुष्य मतामतांच्या गलबल्यात शांत आणि सुखी आहे! हीच माझ्या सुखाची गुरुकिल्ली आहे !
व्वा छान!
LikeLike
Thank you Sameer 😊
LikeLike
Too good yogesh n so true..respecting other’s opinion is a great sign of growth…I liked it…
LikeLike
Thank you Jyoti 😊
LikeLike
Too good Yogesh!
तुझ्या लेखनात काहीतरी असं असतं की ते पटून जातं आणि आयुष्य सोपं वाटायला लागतं!
👍👍
LikeLike
Thank you so much Tai 😊🙏
LikeLike