जवळ जवळ सत्तावीस–अठ्ठावीस वर्षं झाली तरीही मला तो प्रसंग कालच घडल्यासारखा स्वच्छ आठवतो आहे. “मी माझ्या आयुष्याची जोडीदार निवडली आहे” मी माझ्या आई–बाबांना सांगितलं. ह्यात वावगं काही नसलं तरी परिस्थिती जरा स्फोटकच होती. मी बी एस. सी. करून आय.ए,एस. ची तयारी करायला म्हणून घरी बसलो होतो. लायब्ररीत अभ्यास करता करता पल्लवी भेटली आणि मग आम्ही एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचं ठरवलं. माझे सासू–सासरेहि धाडसीच – आपल्या अठरा वर्षाच्या मुलीने रिकामटेकडा जोडीदार शोधलाय हे पचवायला धैर्य लागतं आणि आता माझी मुलगी एकवीस वर्षाची असल्याने मला जरा ते जास्त चांगले समजतंय !! माझ्या घरी हा मी जेव्हा बॉम्ब टाकला तेव्हा काय झालं त्यानं माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा दिली.
मी ही बातमी सांगितल्यावर माझ्या बाबांनी मला शांतपणे विचारले, “आयुष्यात कशाच्या जोरावर हा एव्हढा महत्वाचा निर्णय घेतलास ?” काही न सुचल्याने मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं,”तुमच्या” – त्या तशाही परिस्थितीत माझ्या प्रामाणिकपणाने ते सुखावल्याचा मला भास झाला अन जरा हायंसच वाटलं. माझ्या चित्रपटविषयक अभ्यासाप्रमाणे मला एखादी कानफटीत वगैरे बसायला हवी होती. त्यांनी तितक्याच शांतपणे पुढचा प्रश्न विचारला, “बरं मी सोडून आणखी काही?” “मी उत्तम करियरकरीन ना!” मी एका क्षणात उत्तर दिलं. “मग ठीक आहे. हा निर्णय कधीतरी तुलाच घ्यायचा होता तो तू थोडा लवकर घेतलास असं वाटलं इतकंच. बरं तुला कितीही शिकायचं वगैरे असेल तरीही शीक. उगाच आता कुठल्यातरी नोकरीची वगैरे घाई नको करूस. वेळ आली तर मी लग्नही करून पोसीन दोघांनाही पण करियर काहीतरी चांगलं कर” …. विषय संपला …. मी काय काय संवाद मनात ठेवले होते ते फुकटच गेले आणि पळून–बिळून जायची तर ह्यांनी काही सोयच नव्हती ठेवली!!
तोपर्यंत माझं बापकमाईवर मस्तच चाललं होतं आणि हे जितके दिवस चालतंय तेव्हढं चालवायचा माझा एक धोरणी विचार होता. पण वरच्या प्रसंगानंतर खोल काहीतरी बदललं आणि चांगलं करियर करायचे आणखी काही पर्याय आहेत का ह्याचा गंभीरपणे विचार करायला लागलो. त्यातून मग हात–पाय हलवून एका नामांकित कॉलेज मध्ये एम.बी.ए. ला प्रवेश घेतला आणि पुढे करीयरही बरंच झालं.
वरच्या प्रसंगांनी मला आयुष्याची दिशाच नाही दिली तर एक अतिशय महत्वाचा धडा दिला. आपण ‘जनरेशन गॅप‘ वगैरे बद्दल खूप ऐकतो पण ती कशी हाताळायची ह्याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला. जो निर्णय माझ्यासाठी खूप महत्वाचा होता तो मी घेतला. ह्यानंतर त्यात चुका कितीही काढता आल्या असत्या …. “तुला अजून काय अक्कल/लायकी आहे …. जगाचा अनुभव काय आहे …. ” वगैरे वगैरे बरंच काही. पण त्यांनी त्या निर्णयावर विश्वास ठेवला… वय–नात्याचा मोठेपणा बाजूला सोडून हा निर्णय माझा असला पाहिजे हे पाहिलं मान्य करायला काळीज लागतं, स्वतःच्या संस्कारांवर / नात्यावर विश्वास लागतो. मी तो निर्णय घेतला आहे हे बघितल्यावर तो निर्णय यशस्वी कसा होईल आणि पल्लवी अन मी सुखी कसे होऊ ह्याचाच विचार केला … मला आठवतंय आमचं लग्न झाल्यावर त्यांनी पल्लवीला सांगितलं होतं “तुला जेव्हा कधी काही लागलं तर मला सांग – त्या गाढवाला त्याचाच पगार पुरत नाही !!”
एका शब्दानीही उपदेश न करता ह्या सगळ्या गोष्टी मला खूप काही शिकवून गेल्या. “जनरेशन गॅप” ही काय फक्त घरीच नसते – ऑफीसमध्येही असते. पदाचे हुद्द्याचे मान–अपमान न बाळगता आपण जर आपल्या सहकाऱ्यांचे निर्णय यशस्वी करायला गेलो तर सगळ्यांचंचआयुष्य सुखी होतं ! जर बाबांनी माझी अक्कल काढली असती तर मीही इरेला पेटलो असतो – मग करियर वगैरे करायपेक्षा नुसतेच बंड करून काहीतरी मूर्खासारखं करून बसलो असतो – नुकसान सगळ्यांचंच झालं असतं ! त्यांनी ते होऊनच दिलं नाही. माझ्या आयुष्यात, करियरमध्ये मी जमेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरला – तो किती परिणामकारक होता हे कदाचित माझे कुटुंबीय किंवा सहकारीच सांगू शकतील.
साधारणपणे एकवीस–एक वर्षांनंतर माझ्याच विद्यापीठाने पुढे जेव्हा मला पदवीदान समारंभाला जेव्हा प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं तेव्हा त्या समारंभाला मी बाबांना आवर्जून घेऊन गेलो – तो गाऊन वगैरे घालून उपकुलगुरुंच्या मागे चालत जाताना का कोण जाणे मला सारखा आमचा संवाद आठवत होता ! जनरेशन गॅप ही असतेच त्याची जाणीव ठेऊनजपूनच पाऊल टाकावं लागतं हेच खरं – लंडन च्या ‘ट्यूब रेल्वेस्टेशन‘ वर सांगतात तसं “माईंड द गॅप“!!
योगेश पाटगांवकर
८ डिसेम्बर २०१८
True…acceptance is the biggest challenge put forth by the parents..it also talks about their unconditional love n faith in you..rightly said..great write up
LikeLike
Thank you so much Jyoti 😊
LikeLike
छान
LikeLike
धन्यवाद 🙏
LikeLike