तर्काच्या पलीकडले …

लहानपणी  समर्थ रामदास स्वामींच्या कथांचं  एक पुस्तक वाचताना त्यातल्या ब-याच कथा खूप छान वाटल्या पण त्यांचे अर्थ हे ब-याच वर्षांनी हळू हळू कळत गेले त्यातलीच ही एक कथा …. एकदा  समर्थ रामदासस्वामी आणि शिवाजी महाराज गडावर फेरफटका मारत असताना गडाच्या डागडुजीचं  काम चाललं होतं. बरीच लोकं  त्या कामात गुंतली होती. चालता चालता महाराजांच्या मनात सहज विचार आला की मी तर ह्या सा-यांचा पोशिंदा आहे आणि महाराज मनातल्या मनात सुखावले. महाराजांच्या मनातले विचार ओळखून समर्थ मिश्कीलपणे आपल्याशीच हसले आणि तिथे असलेल्या पाथरवाटला जवळचीच एक शिळा बरोब्बर अर्धी कापायला सांगितली – पाथरवाटाने तसं  केल्यावर सगळेच अचंबितपणे पाहात राहिले – त्या फोडलेल्या शिळेत एक छोटासा खळगा होता आणि त्या खळग्यांत असलेल्या पाण्यात छोटीशी एक बेडकी मजेत खेळत होती. समर्थ महाराजांना म्हणाले,”राजे आपण धन्य  आहात. ह्या चिमुकल्या जीवाचीसुद्धा आपल्या गडावर किती छान काळजी घेतली आहेत.” महाराज ओशाळले आणि तिकडेच समर्थांना दंडवत घातला. आपल्या महापराक्रमी अनुयायाला रोखठोक सांगणारे ते गुरु आणि आपल्या कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन ते समजून घेणारे अनुयायी दोघेही वंदनीय!

ही कथा वाचली आणि जसजसा जगाचा अनुभव येत गेला तसतसा हळू हळू ह्या कथेचा अर्थ कळत गेला. विशेषतः: हल्लीच्या काळात अत्यंत कर्तृत्ववान अशा समजल्या जाणा-या व्यक्तींचा अचानक झालेला अध:पात बघून तर ही गोष्ट मला परत परत आठवते. मला वाटतं  आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटण्यात काहीच गैर नाही पण आपल्या यशामध्ये आपल्या कर्तृत्वापलीकडेही काही असते ही जाणीव असलेली बरी असते. मग ते नशीब असेल, सद्गुरुकृपा असेल, आई-वडिलांचे आशीर्वाद असतील, योग्य वेळेला मिळाली योग्य संधी असेल किंवा योग्य वेळेला भेटलेली योग्य माणसं  असतील पण  आपल्या बुद्धीला समजणा-या  तर्काच्या पलीकडेही काहीतरी असतं ही जाणीव पाय जमिनीवर ठेवायला मदत करते. बरं  ह्या जाणिवेचा  आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काहीच संबंध नसतो. माझ्या यशात माझ्यापलीकडे काहीतरी आहे ही जाणीव षड्रिपूंपैकी सर्वात घातक जो मद  किंवा अहंकार आहे त्यापासून संरक्षण करते.

जर ह्या जाणिवेचं  कवच नसेल तर अहंकार बुद्धीचा ताबा घेतो आणि  माणसाची परिस्थितीचं आकलन करून घ्यायचीही क्षमता कमी होते. कधी कधी आहे ती परिस्थिती मान्य  करून पुढे जाण्यातच शहाणपण असतं. गीतरामायणात भरतभेटीचा प्रसंग अतिशय तरलपणे  वर्णन  केला आहे. शोकाकूल झालेल्या आणि परत परत रामाला वनवासातून परत येण्याची विनंती करणा-या भरताला मर्यादापुरुषोत्तम श्रीराम समजावून सांगतात “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा – दोष ना कुणाचा” अन मग पुढे जाऊन असंही समजावतात की “मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा” – जाणत्याच्या तर्कालाही शेवटी मर्यादा आहेतच – जे दिसतं  आणि जोपर्यंत दिसतं  तिथपर्यंतच तर्कांची  मजल असते पण त्यापुढेही काहीतरी असतं  हे ध्यानात घेणं  हा खरा सुज्ञपणा आहे.  एक लक्षात घेतलं पाहिजे की हे विचार ही हतबलता नाही आहे. सर्व भावनांच्या पलीकडे जाऊन त्यावेळेला वनवासात जाणं हेच बरोबर होतं आणि त्यासाठी कैकेयी किंवा दशरथाला दोष देण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्यात एक शहाणपण आहे. आत्मविश्वास आणि अहंकार ह्यातली सीमारेषा पुसटच असते. दुर्दैवानं अहंकार आणि शहाणपण हे एकत्र राहूच शकत नाहीत. म्हणूनच जर आत्मविश्वास आणि अहंकारातली सीमारेषा ओलांडायची नसेल तर तर्कापलीकडच्या जाणिवेचं कवच आवश्यक आहे.

ही जाणिव जागृत कशी ठेवायची हा प्रश्न फारसा अवघड नाही. वर सांगितलेल्या कथेत महाराज अहंकाराची सीमारेषा ओलांडताना सहज थांबू शकले कारण साक्षात समर्थ त्यांना जागं करायला होतं. आपल्यासारख्या माणसांना समर्थांचा सहवास नसेल तरीही ह्या जाणिवेचं  कवच परिधान करणं  सोपं  आहे. समर्थांच्याच समकालीन तुकोबारायांनी सांगून ठेवलंय “निंदकाचे घर असावे शेजारी” – जेव्हा आपण यशाच्या पाय-या चढत असतो तेव्हा फक्त आपल्या आजूबाजूला असणं-या लोकांना आपल्याशी परखड बोलणं किती सहज जमतं ह्याच्यावर आपलं  शहाणपण ठरतं. त्यासाठी परखड मतांवर तुमची प्रतिक्रिया काय असते ह्यावर सगळं अवलंबून आहे – माझ्याशी वाद घालणारा किंवा माझ्या मताशी सहमत नसणारा म्हणजे शत्रू हा विचार डोक्यात आला कि संपलच सगळं !!

कधी कधी एखाद्या गोष्टीचं  उत्तर ही वेळ असते हेही मान्य करावं  लागतं, नाही केलं तर आपल्याला शिकवायची सोयही निसर्गानेच केलेली असते आणि मग आपली अवस्था कमळात अडकलेल्या भुंग्यासारखी होते ती आपली कोणाचीच न होवो हीच प्रार्थना!

काळोखाचे साम्राज्य पसरते अन कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते

दिवसभर दंगा करणाऱ्या भुंग्याची स्वारी अलगद आत अडकते

जीवाच्या आकांताने भुंगा सुटायची धडपड करतो

नाजूकशा कमळापुढे त्याचा दंगा जरा कमीच पडतो

सकाळची कोवळी किरणे अलगद उतरतात

अन कमळाला गोंजारून भुंग्याला सोडवतात

एक काळोखी घुसमटलेली रात्र भुंग्याला शहाणे करून सोडते

कळते त्याला, की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपले बळ नसते

कधी कधी आपण नुसतेच थांबायचे असते

अन उत्तर हे आकाशातल्या बापाने ठरवलेली वेळ असते!!

योगेश पाटगांवकर

३० नोव्हेंबर २०१८

6 thoughts on “तर्काच्या पलीकडले …

Leave a comment